भोपा गावात सहर्ष
स्वागत करणाऱ्या कमानीखालून आमच्या गाड्या गावात आल्या. तळपतं उन्ह आणि धूळीचे
हलके लोट यातून आम्ही थेट पोचलो ते गावकऱ्यांच्या गऱ्हाड्यात. कॅमेरा, गाड्या याचं
अप्रूप वाटावं, इतकं मागासलेलं हे गावं. एका बोळातून आम्हाला नेण्यात आलं आणि
माणसांनी भरलेल्या घरासमोर उभं करण्यात आलं. हेच ते घरं. पटेकरांचं घरं.
विजयमाला पटेकर हिचा गर्भपाताच्या दरम्यान
मृत्यू झाला आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात ही केस गाजली. विजयमालाच्या पोटात
16 ते 20 आठवड्यांचा म्हणजे 4 महिन्यांहून मोठा गर्भ होता. इतकचं नाही तर हा गर्भ
मुलीचा होता. त्यामुळेच चार मुली असलेल्या महादेव आणि विजयमालानं गर्भलिंगनिदान
करुन त्यानंतर बेकायदेशीर गर्भपातासाठी डाॅक्टरकडे धाव घेतल्याचा प्राथमिक अंदाज
आहे. गावात गेल्ायवर अशीही माहिती कानावर आली की, विजयमालाचं हे खरं तर सहावं
गर्भारपणं होतं. पाचव्यांदा तिला मुलगी होती म्हणून पिशवी साफ केली होती. पण
सहाव्यांदाही तिला मुलीचाच गर्भ राहिला. डाॅ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांचं
परळीतलं हाॅस्पिटल हे अशा प्रकारचे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करुन मुलींचे गर्भ
पाडून देत असे, अशी माहिती महादेवला मिळाली. त्यामुळे शेजारच्या तालुक्यातून
महादेव आणि विजयमाला डाॅ. मुंडे यांच्या हाॅस्पिटलमध्ये पोचले होते. पण
गर्भपाताच्या दरम्यान विजयमालाचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या नंतर तिला मोठ्या
प्रमाणात रक्तस्त्रावही झाला. जो तिच्या जिवावर बेतला. डाॅक्टर मुंडे यांच्यावर कोणती
कारवाई करायची, त्यामध्ये हलगर्जीपणा होतोय का हे सगळे प्रश्न ठळकपणे चर्चेला जात
असताना या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही भोपा गावात पोचलो.
जिजा
(एकनाथ आवाड) आमच्यासोबत होते. कारण, टीव्हीवाल्यांमुळेच माझ्या पोराला पोलिसांनी
उचलून नेलं, असा राग महादेवची आई नीलाबाईच्या मनात होता. त्यामुळे अशा ठिकाणी
जिजांची मध्यस्थी नसती तर पोचणं जिकीरीचं होतं.
नीलाबाई दारातच बसली होती. तिच्यासोबत तिची चार
नातवंड, बुढ्ढा आणि नातवंडांची आत्या म्हणजे महादेवाची बहीणही होती. विजयमाला आणि
महादेवच्या या जगात जन्माला न आलेल्या 5 व्या मुलीसाठी स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न
सगळेजण मांडत होते. पण, त्यांच्या जन्माला अालेल्या या 4 मुलींच्या जगण्याचा
प्रश्न देखील गंभीर होता. त्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. आई कायमची दूर गेली. आणि
बाप तुरुंगात. गावचे लोक पायली पावशेर धान्य आणून आजीकडे देतात. त्यावर गुजराण
सुरुय. महादेवसाठी कोर्ट कचेरी करायला, वकील लावायलाही नीलाबाईकड़े पैसा नाही.
इतकंचं काय त्याला कोठ़डीत डबा द्यायला जाणं देखील त्यांना शक्य नाही. की,
विजयमालाचं मृत्यूनंतरचं क्रीयाकर्म करणंही पैशाअभावी शक्य नाही.
हा महादेव कारखान्यावरुन पैशाची उचल घ्यायचा. कारण,
महादेव सोबत राबायला जोड होती, त्याच्या बायकोची. ऊसतोडणीसाठी असं एक जोडपं असेल
तर त्याला कोयतं असं म्हणतात. या कोयत्याच्या भरवशावर अख्खं घरं चालतं. कारखानदार
उचल देतो. मुकादम काम देतो. आणि संसाराला वंगण मिळतं. बीडी जिल्ह्यातले मजून
मोठ्या संख्येने ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. कोयतं असलं की, घरचं काम धाम पहाटेची
भाकरी तर होतेच. सोबत हक्काचं काम मिळतं. कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला तर
त्याची जोडीदारीण आल्यावर घरचं कोयतं तयार होतं. पण जर मुलगी जन्माला आली तर तिचं
लग्न लावण्यासाठी हुंडा जमवण्याचा खर्च. शिवाय, मुलगी घराबाहेर जाणार त्यामुळे
कोयतं तयार होत नाही. इतक्या साध्या संसार चालवण्याच्या गणितातून महादेवला मुलगा
हवा होता. कुटुंबनियोजनाबद्दलचं अज्ञान, मुलगा हवा हा हव्यास आणि अठराविश्वे
दारीद्र्य...अशा या बीडच्या स्थानिक परिस्थितीतून फावलं ते डाॅक्टर सुदाम
मुंेडसारख्या मुलींच्या मारेकऱ्याचं.
खरं तर पीसीपीएनडीटी कायद्यामध्ये गर्भलिंगनिदान
करायला प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबातल्या सदस्यांवरही कायदेशीर कारवाईची तरतूद आहेच.
बीडमधल्या गरिबांची ही आर्थिक हतबलता त्यांचा मुलगा हवाचा हव्यास अधिक पोसते. तर,
डाॅ. मुंडे कडे रीघ लावलेल्या बीडबाहेरच्या पेशंटची मानसिकता ही पैशातून आलेल्या
मिजासीतून मुलीला मारुन टाकत होती. महादेव सारख्या अनेकांनी गर्भलिंगनिदान करुन
आपल्याच पत्नीच्या पोटात वाढणारा मुलीचा गर्भ पाडण्यासाठी पोटाला चिमटा दिला.
हजारो रुपयांची कर्ज काढली. तर दुसरीकडे, पैसा हातात खेळणाऱ्या कुटुंबाना वंशाचा
दिवा हाच पुरुषार्थाचं प्रतीक वाटत होता.
महादेवने पोलिसांना सगळ्यांत पहिल्यांदा
दिलेल्या जबाबामध्ये खरी कहाणी सांगितली. पिशवी साफ करायला कसे गेलो होतो, आणि काय
होऊन बसलं हे सगळं सांगितलंय. पण नंतर ही बातमी जसजशी आक्राळ विक्राळ रुप धारण करु
लागली, तसं महादेवला सल्ला मिळाला. खरं बोलू नकोस. महादेवने आता त्याचा जबाबच
बदललाय. महादेवच्या घरी जाईपर्यंत मला त्याची चीड येत होती. स्त्रीभ्रूणहत्या
करणारा बाप असा त्याचा क्रूर चेहरा वाटायचा. पण त्याचं घरं पाहिल्यावर मला त्याची
हतबलता समजली. त्याचं समर्थन मी करत नाहीय. पण, निव्वळ मुली मारण्याच्या क्रूर
भावनेतून महादेवने हे कृत्य केलं नाही, ही त्याची बाजू समजून घेता आली. आपल्या
पहिल्या चार लेकींची महादेव मायेने काळजी घेतो. प्रेमचंद आज असते तर त्यांनी
महादेव वर अख्खी कादंबरी लिहिली असती, असं वाटून गेलं.....हे सगळं इतकं व्यापक
आहे. मानवविकास निर्देशांकात बीड जिल्हा किती खालच्या क्रमांकावर आहे, याची चर्चा
होते. बीडचे कारभारी असं बिरुदं मिरवण्यासाठी घमासान राजकारण तिथं रंगतं. पण, इथली
गरिबी दूर करणं, कुटुंबनियोजनाची साधनं गावागावात माहिती करुन देणं, त्याबद्दल
प्रचार करणं हे ना राजकारणी आज करत आहेत, ना सरकारची व्यवस्था.
डाॅ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्या
प्रकरणामुळे बीडची बदनामी होत आहे, असे सूरही एेकू येत होते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात
अशा अनेक परळी आहेत, त्यांचं काय करणार, असा संतप्त सवालही विचारला जात होता. हा
प्रश्न रास्तच आहे. कारण, केवळ डाॅ. सुदाम आणि सरस्वती मुंडेवर कारवाई केल्यानं
किंवा राज्यातल्या स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डाॅक्टर्ांवर कारवाई केल्यानं हा
प्रश्न सुटणारा नाही.
हुंड्यांचा गंभीर प्रश्न, मुलींच्या सुरक्षेचे
प्रश्न, परंपरांचा पगडा, स्त्रियांनाा दिलं जाणारं दुय्यम स्थान आणि पुरुषत्वाच्या
भंपक कल्पना या सगळ्याचा जबरदस्त पगडा हटवणं हे देखील तितकचं गरजेचं आहे. मुलींचे
मारेकरी असणाऱ्या डाॅक्टरवरच्या कारवाईमुळे केवळ या लढाईला कायदेशीर पाठबळ मिळेल.
पण ज्यांच्याक़डे पैसा आहे, ते परदेशात जाऊन लिंगनिदान करुन मुली पाडतात. तर कुणी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलीचा र्गभच राहू नये, याचीही दखल घेतो.
बीड जिल्हा महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येसाठी
रेड झोनमध्ये मोडणारा जिल्हा आहे. दरहजारी पुरुषांमागे इथं मुलींचं प्रमाण
झपाट्याने खाली येतंय. महिला राजकारण्यांनी गेल्या वर्षभरात मुलींना वाचवण्यासाठी
यात्रा काढल्या. त्यातून त्यांची प्रसिद्धी अधिक झाली. मुलींचे जीव वाचण्याचं
प्रमाण तुलनेने किती होतं, याचा विचार अंतर्मुख होऊन करण्यासारखी परस्थिती आहे.
डाॅ. सुदाम आणि सरस्वती मुंडेंचे काळे कारनामे
एकामागोमाग एक उघड झाले. त्यांच्या हातात कधीतरी बेड्या पडतीलच. पण केवळ डाॅ मुंडे
यांच्या अटकेने बीडमधला मुलींच्या घटत्या संख्येचा प्रश्न सुटणार नाही. तसं जर
कुणाला वाटत असेल तर ते साप समजून काढीला बडवण्यातला प्रकार होईल. प्रत्येकाला
स्वतच्या घरात कोयतं हवंय. पण जर मुलीच उरल्या नाहीत तर कोयतं कसं बनेल, इथून प्रबोधनाची
गरज आहे. कोयतं जुळण्यासाठी मुली वाचवा, असं म्हणणं हे अमानवी ठरेल. व्यक्ती
म्हणून मुलींना जगायचा हक्क दिला पाहिजे. हे सगळं खरं आहे. पण पिचलेल्या गरिबिला
माणुसकीची ही शिकवण पचत नाही. तेव्हा गरिबीला पचेल असा डोस महाराष्ट्र शासनाने
तयार केला पाहिजे.
डाॅ. मुंडेला दोष दिला जातोय. पण त्याच्याकड़े
रांग लागायची, म्हणजे समाजालाही असे डाॅक्टर हवेच आहेत का, हा प्रश्न आहे. आणि या
समाजाच्या मानसिकतेचं काय करणार, ती बदलत नाहीत तोपर्यंत कितीही हाॅस्पिटल सील
झाली तरी असे कत्तलखाने सुरुच राहतील.


