Social Icons

Pages

Saturday, July 21, 2012

इज्जत !

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील एका गावातून एक तरुण आणि त्याची बायको अगदी नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं ‘आयबीएन लोकमत’च्या कार्यालयामध्ये शनिवारी सकाळीच आलं. सोबत कपड्यांच्या बॅगा आणि त्यांचा अत्यंत विश्‍वासू मित्र होता. मामला लैला-मजनूचा होता. मिया बिबी राजी होते. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. पण.. मुलगा वंजारी जातीचा आणि मुलगी होती शहाण्णव कुळी मराठा. सगळं प्रकरण तिथंच सुरू झालं होतं.




मुलगी नोकरीनिमित्त आधीच घरापासून दूर भाड्याच्या घरात राहत होती. तिचे वडील ज्या शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते, त्याच संस्थेत तिचा जोडीदार नोकरी करत होता. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मुलीच्या घरून कडवा विरोध होणार, याचा अंदाज त्या दोघांनाही होताच. त्यामुळेच त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि मॅरेज सर्टिफिकेट येण्याआधी त्या मुलीला घरच्यांचं बोलावणं आलं. तिला अंदाज आला नव्हता की, आपण केलेल्या लग्नाची कुणकुण घरी लागली असेल असा.. पण ज्या वकिलाकडं कागदपत्रं देण्यात आली होती त्यानंच हुशारी दाखवून मुलीच्या घरच्यांना सावध केलं होतं. ती मुलगी घरी गेली त्याच दिवशी तिला एक स्थळ दाखवण्यात आलं आणि तिचं लग्न करून टाकायचा निर्णयही घेण्यात आला. पण मुलीनं विरोध केला. त्याच दिवशी तिनं घरातून पळ काढला आणि ती थेट आली नवर्‍याकडे.


त्या दोघांनाही गाव सोडण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. तिच्या नातलगांचा, जातीचा दबाव एवढा होता की, आई-बाबांनी तिला हे लग्न मोडायला लावलं असतं. पण तिला आपण निवडलेल्या जोडीदारासोबतच राहायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदा वापीच्या एका मित्राकडे आणि तिथून ‘आयबीएन लोकमत’च्या कार्यालयात असा त्यांचा ‘हनिमून प्रवास’ सुरू होता.


अशी अनेक जोडपी आंतरजातीय विवाह केल्यानंतर चांगलीच अडचणीत सापडतात. घरच्यांच्या ससेमिरा असा काही मागे लागतो की, पळता भुई थोडी होते. मग त्यांना ‘भूमिगत’ होण्याशिवाय पर्यायच नसतो. अशा शेकडो जोडप्यांना सर्वतोपरी आधार देणारं हक्काचं नाव म्हणजे गिरीश फोंडे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्याची एक मोठी मोहीम राबवली जाते. त्या मोहिमेचं कोल्हापूरमधलं काम पाहणारा गिरीश. आमच्या कार्यालयामध्ये आलेल्या या जोडप्यालाही आम्ही गिरीशच्या स्वाधीन केलं.
हे जोडपं आमच्या कार्यालयापर्यंत हक्कानं पत्ता शोधत आलं. कारण ‘नांदा सौख्यभरे’ नावाचा आंतरजातीय विवाहावर केलेला शो त्यांनी पाहिला होता. सातारा जिल्ह्यामध्ये आशा शिंदे नावाच्या एका तरुण मुलीची तिच्या बापानेच हत्त्या केली. आशाने जो जोडीदार निवडला होता, तो तिच्या जातीबाहेरचा होता आणि म्हणूनच बापानं तिची क्रूर हत्त्या केली होती.


सातारा जिल्ह्यातल्या पुरोगामी अशा औंध गावातल्या या घटनेचे तीव्र पडसाद उठले, असं मी म्हणेन. कारण ही मुलगी सातारा जिल्ह्यातच लक्ष्मण माने यांच्या एमएसडब्ल्यू कॉलेजमध्ये शिकली होती. स्वतंत्र विचारांची होती. बंडखोर होती. सातार्‍यात आशाच्या खुनाचा निषेध केला गेला. पुण्यातही तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभाग घेतला.या सर्व घटनांच्या रिपोर्टिंगच्या निमित्ताने मी सातारा जिल्ह्यातल्या अनेक तरुण-तरुणींसोबत बोलले. आंतरजातीय विवाह केलेल्या तरुण-मध्यमवयीन जोडप्यांचे अनुभव ऐकले आणि सुन्न झाले.




महाराष्ट्र पुरोगामी नाहीच आहे.. असं सातार्‍यातल्या एका तरुणाने संतापून मला सांगितलं. इथं राजकारणामध्ये जातीनिहाय आरक्षणं मिळाली. दुसरीकडे, खुल्या वर्गातल्या राजकारणानेही जातीच्याच आधारे आपली मूळ भक्कमपणे रोवलीयत. तर, समांतर पटलावार पाहिल्यास राज्यात सर्वाधिक स्त्रीभ्रूण हत्त्या करणार्‍यांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. इथं माणुसकीपेक्षा जात आणि लिंग या आधारेच समाज चालतो. प्रथा परंपरांचा पगडा मोठा आहे. ‘समाजा’चा दबाव आहे. संपत्तीतून आलेली समृद्धतता आहे. आणि त्यामुळेच सातार्‍यामध्ये मराठा समाजात जातीचा बडगा सतत उगारला जातो. आशाच्या हत्त्येआधी मूलगाव (तालुका पाटण) इथं आंतरजातीय विवाह केलेल्या मुलाच्या आईला जी अमानुष मारहाण करण्यात आली ती याचंच प्रतीक होती.


अनेक तरुणांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. यामध्ये दोन भाग होते. प्रेमविवाह करायलाच अनेक कुटुंबामध्ये विरोधच आहे. त्यातही आंतरजातीय (किंवा ज्याला जातीबाहेरचा जोडीदार असंही म्हणतात) जोडीदार निवडणं, म्हणजे भयंकर पाप, असेच संस्कार मुलांवर केले जातात. आम्ही तुझ्यासाठी आयुष्यभर इतकं सगळं केलं, आता लग्नासाठी आम्हाला का दुखावतेस, असा भावनिक पेच मुलांपुढे टाकला जातो.
हा जातीचा सापळाच आहे. परंपरांनी तो रचलेला आहे आणि त्या सापळ्यात मुलं फसणार हे कट्टर जात पाळणार्‍यांनी ओळखलेलं आहे.  मुलं आंतरजातीय विवाह करायला निघतात तेव्हा अनेक पालक सगळ्यात पहिला उपाय अवलंबतात तो म्हणजे आम्ही आत्महत्त्या करू, अशी धमकी! त्यानं मुलं बधली नाहीत तर, राजकीय वजन वापरून मुलाला किंवा मुलीकडच्या नातलगांना पोलीस केसमध्ये अडकवणं, असाही फंडा वापरला जातो. तरीही आंतरजातीय लग्न करणारच, म्हटलं की, ‘आत्ताच्या आत्ता घर सोड’, असे आदेश पालकांकडून मुलांना दिले जातात.


नेसत्या कपड्यानिशी घरं सोडलेली अशी कितीतरी आंतरजातीय जोडपी राज्यात आहेत. ‘तू स्वत:चा विचार करतोस / करतेस, पण तू असं लग्न केल्यावर पाठच्या भावंडांच्या लग्नाचं काय,’ असंही विचारून त्या व्यक्तींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. गुंड सोडून धमकावलं जातं. काही पालक मुलांना सरळ सांगून टाकतात, आम्ही तुम्हाला मदत करू, पण हे बाहेर कळू देता नये. काही केसेसमध्ये शारिरीक हल्ले करण्याचे प्रकारही घडलेले आहेत किंवा मुलीला मानसिकदृष्ट्या खच्ची करणं. त्यातून खचलेली मुलगी मागे फिरली की, सगळाच डाव फिरवला जातो. मुलीला कोंडून ठेवण्याचे प्रकारही अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये घडतात. म्हणूनच मग ‘साथिया स्टाइल लग्न’ अशी फ्रेज प्रेमविवाह करणार्‍यांमध्ये रूढ झालीय. ‘साथिया स्टाइल लग्न’ म्हणजे लग्न करून मुलीनं आपल्याच माहेरी राहायचं आणि मुलानं पण आपल्या घरी काही कळू द्यायचं नाही, वेळ येईल तेव्हाच खरी गोष्ट उघड करायची.
 


 आणखी एक नामी उपाय म्हणजे, पळून जाऊन लग्न करायचं आणि गावाकडे कायमची पाठ फिरवायची. अनेक केसेसमध्ये मात्र पळून जाऊन लग्न केल्यावर पहिलं किंवा दुसरं मूल झालं की, सासर-माहेरचा जातीसाठी असणारा राग हळूहळू निवळतो, असंही दिसून आलंय. केवळ जातीतलीच मुलगी हवी एवढं बंधन नसतं, तर सोयरिक ठरवण्याची कुटुंबंही ठराविक असतात. त्याच परिघामध्ये नवरी/नवरा शोध घ्यावा लागतो. जातीसाठी कट्टर असणारे जे लोक ही अलिखित जातपंचायत चालवतात, त्यांचा उल्लेख आंतरजातीय लग्नासंदर्भात ‘समाज’ असा केला जातो. तर ‘समाजा’ने घालून दिलेल्या या अटी मोडण्याचं धाडस दाखवलं तर अख्ख्या कुटुंबालाच बहिष्कृत करण्याचा नवा जातीय दहशतवाद राज्यभरात प्रचलित झाला आहे. पुण्यातल्या गौंड सारस्वत ब्राह्मण समाज पंचायतीने तर कळस गाठलाय.

 आंतरजातीय विवाह केल्यावर बहिष्कृत करण्यासोबतच पाच-सहा लाखांचा दंडही पंचायतीकडून आकारला जातो. या विरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आली आहे. हे मानसिक ऑनर किलिंग आहे, अशा शब्दांत याचिकाकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. अनेक जातींमध्ये ही सगळी बंधनं पाळायची तर योग्य मुलीच मिळेनाशा झाल्या आहेत. तरुणांची लग्न लांबणीवर पडतायत. पण, पालक हट्ट सोडायला तयार नाहीत आणि मुलं बंड करायची हिंमत दाखवत नाहीत. गावासोबत पंगा कसा घेणार, पुन्हा अडल्या-पडल्याला गावीच यायचं असतं. समाजाला दुखवून चालत नाही, असं उत्तर अशा तरुणांकडून सहजपणे पुढं केलं जातं.


आंतरजातीय विवाहालाच एवढा मोठा विरोध दिसतो की, आंतरधर्मीय विशेषत: हिंदू मुसलमान, हिंदू बौद्ध, बौद्ध-हिंदू अशी लग्न म्हणजे अनेकदा गावांमध्ये वर्‍हाडाऐवजी तणावाला निमंत्रण देणारी असतात.
लक्ष्मण माने म्हणतात, ‘जात हे कवच बनलंय. जातीचा आधार घेऊन सुरक्षित आयुष्य जगता येतं हेच जात पाळण्यामागचं सर्वात प्रमुख कारण आहे. केवळ काही ठराविक समाजातच जात पाळली जाते, असं नाही तर दलित-ओबीसी-इतर मागासवर्गीय आणि अगदी भटके विमुक्तांमध्येही ‘रोटी-बेटी’ व्यवहारात जात पाळली जाते.



तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर म्हणतात की, जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. जात पाळणं हे विज्ञानाच्या विरोधी भूमिका घेणं आहे, हेच मुलांच्या मनावर बिंबवलं तर जातविरहित समाजाकडे वाटचाल होऊ शकेल. डॉ. दाभोळकर म्हणतात त्याप्रमाणे, प्रेम ठरवून केलं जात नाही. प्रेमात पडल्यानंतर जात आडवी येते. त्यामुळे जातीपातीचं निर्मूलन करण्यासाठी आंतरजातीय विवाह होतात, असं मानायचं काही कारण नाही. पण आंतरजातीय विवाहामुळे जात निर्मूलनाच्या लढाईला मात्र मोठं बळ मिळतं हे खरंय.

1 comments:

sharad said...

sorry, far ushira hi aapli post mala vachayla milali,aapli vastav mandnyachi ek khas shaili aahe,vradyala bhidte, chha, asech lihat, mandat raha. ya prasangi mala vatte ki jatiche astitv joparyant rahil toparyant he asech hot rahnaar, ani jat panchayatichya nirnnyanchi kurghodi zali tar manala aawar ghalun shant rahnarech adhik sapadtil ani band karnare botavar mojnyaitkech.vastav he aahe ki Hindu dharm hya jatinche astitv jopasto,ani yala khatpani deto bramhanvarg ,he sarv badlnyasathi he aantarjatiy vivahasathi utsuk asleli mandali pudhe yet naahi,keval eka mulishi lagn karne evdhach kay to sankuchit hetu asto. hya samashyanche mul karan shodun tya vishvrukshachya mulasakat uptaychya kami joparyant hi tarun shikleli mandli lagat nahi toparyant ase chatke lagtach rahnaar.
aaplya pudhil vatchalis lakho-lakh bhimeccha.

 

Sample text

Sample Text

Sample Text