Social Icons

Pages

Tuesday, July 24, 2012

नक्षलवादाच्या बुरख्याआड


    कोकणातले आदिवासी-ठाकर मी पाहिले होते. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातले आदिवासी पाहिले होते. मेळघाट, पश्चिम विदर्भ इथंही अनेक आदिवासी कुटुंब पाहिली. खूप जवळून त्यांच्यासोबत राहता आलं नाही. त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला सर्वाधिक अस्वस्थ केलं ते गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जगण्याने.

    गडचिरोली जिल्ह्यामध्ये एन्ट्री करायची म्हणजे काहीतरी धाडसी कृत्यंच आपण करतोय, असा समज व्हावा, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात पोचेपर्यंत असंचं वाटत होतं. धडधड सुरु होती. होमवर्क नीट केला असला तरीही, नक्षलवादी जागोजागी उभेच असतात, असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात गडचिरोलीमध्ये रात्री 11-12 वाजेपर्यंत निवांत रहदारी सुरु होती. छोटी मोठी हाॅटेल्स- आईस्क्रीम पार्लर, बाईक्स आणि वीकेंड क्राऊड सुद्धा दिसत होता....म्हटलं हे काय?..आपल्याला (आणि गडचिरोलीमध्ये पूर्वी कधी न आलेल्या आपल्यासारख्या अनेकांना) वाटतं की हा अख्खा जिल्हा नक्षलग्रस्तच आहे. पण तसं नाहीये. जिल्ह्याच्या पूर्वेकडचे 8 तालुके हे नक्षलप्रभावित तालुके आहेत. काही ठिकाणी तर नक्षलवाद्यांचा हैदोस सुरु असतो असंही म्हटलं तरी चूक ठरणार नाही.
    
    पण चार तालुक्यातलं जनजीवन हे नक्षलबाधित नाहीये. अगदी एका वाक्यात सांगायचं तर गडचिरोलीमधल्या नक्षलवादाचा बागूलबुवा निर्माण करण्यात आलाय. 60 टक्के जंगलमय असलेला हा जिल्हा खरचं एकदा तरी भटकण्याइतपत सुंदर नक्कीच आहे.
  
    आता हे म्हणत असतानाच मी दुसरी बाजूही मांडणार आहे. ती दुसरी बाजू आहे, ज्यांनी मला सर्वाधिक अस्वस्थ केलंय त्या आदिवासींच्या जगण्याबद्दल- आणि मरणाबद्दल....मरण हेच त्याचं जगणं बनलंय अशा त्यांच्या उध्वस्त आयुष्याबद्दल...जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना त्यातही पत्रकारांना नक्षलवाद्यांनी अजून पर्यंत धोका पोचवलेला नाहीये. पण तिथं राहणाऱ्या स्थानिकांचं काय हे मला समजून घ्यायचं होतं.
   
    आम्ही सुरुवात केली धानोरा तालुक्यापासून. कुठं मोठी गावं तर कुठं आठ दहा घरं असेलेली छोटी छोटी गावं, तर कुठं झारखंडहून येऊन स्थायिक झालेल्या आदिवासींची जुन्या शाकारणीची झोपडीवजा घरं, शेणानं सारवलेली स्वच्छ आंगणं आणि असं गावा-गावाचं चित्र. काम करुन कावलेला...करपलेला आदिवासी असो किंवा त्याच्यासोबत सतत राबणारी त्याची कारभारीण. कष्टकऱ्यांची संस्क़ृती त्यांचे कपडे आणि राहणीमान पाहिल्यावर लगेच डोळ्यात भरते. त्यांची घरं पाहिली की, आपण शहरातल्या सुखवस्तू राहणीमानाशी सहज तुलना करायला लागतो...आणि या घरची गरिबीही मग बोलू लागते...असं असलं तरी कुणाही परकी माणसांसोबत आदिवासी आदराने बोलतात. सगळ्यांना मराठी भाषा येत नसली तरी तोडकंमोडकं बोलतो. गोंडी भाषा येत असेल तर काम अधिक सोपं होतं. पण, गावातल्या लोकांसोबत नक्षलवादी या विषयावर थेट बोलणं तसं अवघडचं. तेव्हा त्यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. मग निघायचं झालं तेव्हा त्यांच्याबद्दल विचारलंच... एक भाऊ मला म्हणाला...का हाये आमच्याकडे मॅडम, जसं वनवासी जीवन जगत होते तसचं आम्ही जगत हाओ.. काही काही गावात नक्षलवाद्यांना जंगलवाले किंवा बंदूकवाले म्हणून संबोधलं जातं. ते थेट नक्षलवादी असा उल्लेख करत नाहीत.
    
    मी भाऊला विचारलं, आदिवासी विकास खातं आहे मंत्रालयात. कोट्यवधीचा विकास निधी येतो. नक्षलग्रस्त भागात तर जास्त पैसा येतो. मग वनवासी जीवन कसं म्हणता...यावर भाऊनं त्याचं घरं दाखवलं. बांबूची बेळं...लाकूड आणि जंगली साहित्याचा वापर करुन शाकारलेलं घरं, उन्हाळ्यात बांबू कटाई किंवा तेंदू पत्ता वेचायचा हा रोजगार. ताडी-माडी पिऊन श्रमोपरिहार करायचा. किंवा आंबील पिऊन दिवस काढायचा. जंगली प्राण्यांची शिकार. नाहीतर भातात चहा घालून खायचा. पावसाळ्यात धानाची शेती. याशिवाय अनेक वनोपज वस्तू जमा करणं हा काही आदिवासींसाठी व्यवसाय...दूरदूर अंतरावर असलेली गावं...टोला..सुनसान रस्ते. आणि घनदाट जंगल. याच जंगलात नक्षलवादी राहतात.

    धानोरा तालुक्याप्रमाणेच आम्ही इतर तालुक्यातल्या अनेक गावात फिरलो. गावांची नावं आणि आमच्यासोबत ज्या गावकऱ्यांनी गप्पा मारल्या त्यांची नावं मात्र आम्ही सुरक्षेसाठी देत नाही आहोत. एका भाऊला मी विचारलं, जंगलवाले गावात कशाला येतात? त्यानं समजावलं... नक्षलावाद्यांना जेवण हवं असतं, गावागावतली माहिती हवी असते. ठेकेदाराकडून खंडणीचे हप्ते हवे असतात. वेळ पडते तेव्हा राहायला जागा हवी असते. यापैकी काहीही करायला नकार दिला किंवा आदिवासी पोलिसांना सहकार्य करतोय असा संशय जरी आला तरी नक्षलवादी या आदिवासींना क्रूरपणे कापतात किंवा गोळ्या घालतात. गावकरी स्वत:हून म्हणाले की, काही वर्षांपूर्वी जंगलवाले समज देऊन जायचे. आता गोळ्यांशिवाय काय बातच होत नाही. आपल्यासोबत एकाच गावात लहानाचा मोठा झालेल्या व्यक्तीचा मुडदा गावातच पडलेला पाहिला, त्याच्या सोबत नक्षलवाद्यांनी टाकलेली पर्ची वाचली की भ्या तर वाटतोच ना, आपलं पण असं होईल, असं मनात येत राहतं, असं अनेकांनी सांगितलं.
   
    रैजीची हत्या 6 महिन्यांपूर्वी झाली. स्थानिक पोलिसांच्या नोंदीनुसार पत्ता आणि माहिती मिळाली होती. पण गावकऱ्यांना घरं विचारत आम्ही रैजीच्या घरी पोचलो. उजव्या खांद्यावर फाटलेला टी शर्ट घातलेला रैजीचा मुलगाच आम्हाला भेटला. सुंभाच्या दोरीला प्लॅस्टिकची बाटली बांधलेली आणि ती दुसऱ्या खांद्यावर लटकवून तो नुकताच परत आला होता. हा शेतीमध्ये राबतो आईसोबत. बायको दोन मुलांना सांभाळते. तर रैजीचा दुसरा मुलगा मतीमंद आहे. तो आमच्याकडे बघून फक्त हसत होता. तंबाखू खात होता. पण त्याला काहीच कळत नाही. घरच्यांना त्याची सतत काळजी लागलेली असते. रैजीच्या बायकोने तेल चोपून केस बांधले होते. जुन्या पिढीतली असल्याने अंगात ब्लाऊज नव्हता. तिला मराठी कळत होतं. पण बोलता येत नव्हतं. मग रैजीच्या मुलानंच त्याच्या बापाच्या हत्येची कहाणी आम्हाला सांगितली.
    
    रैजी आणि त्याची बायको शेतातल्या घरी होते. तिथं बंदूकधारी नक्षलवादी रात्री अचानक आले. त्यांनी रैजीला ओढून सोबत गावात आणला. गावच्या एकाही माणसाची बाहेर येण्याची टाप नव्हती. रैजीच्या मुलानं नक्षलवाद्यांपुढं हात जोड़ले. पण नक्षलवाद्यांनी त्यांचं एेकलं नाही. रैजी पोलिसांना माहिती पुरवतो, असा त्यांचा समज होता. म्हणून त्यांनी रैजीला मारुन टाकणार असल्याचं जाहीर केलं आणि गावातल्या मुख्य चौकात आणलं.
    
    मुलाच्या आणि आईच्या समोरच त्याला गावच्या चौकात बांधण्यात आलं. लाकडाने मारहाण करण्यात आली. विव्हळत असलेल्या रैजीला बघून त्याच्या पत्नीने सांगितलं की, काही चुकलं असेल तर माफी करा. पण मारु नका, तेव्हा तिला धमकावण्यात आलं की तुलाही आम्ही ठार मारु...त्याला पहिली गोळी घालण्यात आली तेव्हा रक्तबंबाळ रैजीला पाहण्याची हिंमत त्याच्या पत्नीमध्ये उरली नव्हती. स्वत:च्या डोळ्यादेखत मरणाऱ्या नवऱ्याला ती अखेरची साथ देऊ शकली नाही. ती आणि तिचा मुलगा घरात आले. जेव्हा रैजीला ठार करुन गावातून नक्षलवादी निघून गेले. त्यानंतर गावकरी आणि रैजीच्या मुलानं घरातून बाहेर पडून रैजीचा मृतदेह बघितला.
    
    रैजी कहाणी सांगेपर्यंत गावातले काहीजण भोवती गोळा झाले होते. मी विचारलं, अशी हत्या होते तेव्हा पोलीसांना कळवता का? गावकऱ्यांनी सांगितलं पोलीस दुसऱ्या दिवशी सकाळी आले. तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याला न्यायचा, तिथून तो हाॅस्पिटलमध्ये पीएम साठी न्यायचा हे सगळं गावकऱ्यांनीच केलं.
     
    रैजीची कहाणी एेकून वाटलं की, अशी एखादीच हत्या वर्षाकाठी होत असावी...पण हेटी गावात तर म़डावी आणि त्याच्या तरुण मुलाला एकाच रात्री नक्षलवाद्यांनी ठार केलं होतं. पहिल्या घटनेचाच पॅटर्न या गावातही आढळला. रात्री साधारण दहानंतर नक्षलवाद्यांचा 50 ते 150 जणांचा शस्त्रधारी जमाव गावात आला होता. ज्याला ठार करायचं आहे त्याच्या म्हणजे मडावीच्या घराभोवती त्यांनी गराडा टाकला होता. मडावीच्या दोन बायका होत्या. त्यातली छोटीवाली आम्हाला माहिती देत होती. ती, मोठी बायको आणि दोघींची मिळून मडावीची चार मुलं घरात होती. पण, मडावीला नक्षलवाद्यांनी घरात घुसुन बाहेर आणला. त्याला सोडवायला गेलेल्या मुलाला त्यांनी निर्घृणपणे ठार केलं. मडावीचं धड शिरापासून वेगळं केलं होतं. कॅमेरा बाजूला ठेऊन खूप वेळ गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी हे सांगितलं.
    
    मडावीचं डोकं आधी भिंतीवर आपटण्यात आलं. त्याचे हाल हाल करुन मग त्याला गोळी घातली आणि मग त्याचा गळा सुद्धा चिरला. त्याच्यापासून 50 फूटावर त्याच्या मुलाला गोळी घालून मुडदा रस्त्यावर टाकण्यात आला होता. आता मडावीच्या घरच्यांचं पुनर्वसन सरकारने केलंय. त्यांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळ क्वार्टर राहायला दिलीय. पण शेती घर-दार सोडून तिकडे दूर घरच्यांचं लक्ष लागत नाही. तिघांपैकी एका मुलाला सरकारने नोकरी लावली असती, तर आमचं भागलं असतं, असं मडावीची बायको सांगत हाेती.  
   
    गावचे संरपंच, ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, कार्यकर्ते, सामान्य आदिवासी, सरकारी नोकर, अशा सगळ्यांसोबत आम्ही बोलत होतो. अनेकजण निरनिराळी माहिती देत होते. नक्षलवाद्यांना ज्याचा राग आहे, त्या व्यक्तीला धमकावतात (समज देतात) आणि ते निघून जातात, पण हे क्वचितच...बऱ्याचदा त्या व्यक्तीला नक्षलवाले बळजबरीने सोबत घेऊन जातात. आठ दिवसांनी पाठवून देऊ, असं सांगतात. पोलिसांत खबर देऊ नका, असा दमही भरतात. सिरोंचा रोडवर नंदीगावमध्ये अशाच एका आदिवासीला त्यांनी रातोरात झोपेतून उठवून उचलून नेलं. त्याला सहा मुलं आहेत. सर्वात धाकटा पोरगा चार वर्षांचा आहे. आठ दिवसांनी त्या आदिवासीला त्यांनी गावात परत आणला. त्याच्याच घरासमोर, गावकऱ्यांना सांगितलं हा पोलिसांचा मुखभीर आहे. म्हणून याला मारलंच पाहिजे. गावातल्या मोठ्या लोकांनी नक्षलवाद्यांना  विनवणी केली की बा त्याला मारु नका. चूक झाली असेल तर एकदा सांगा. पण लेकर बाळं उघड्यावर येतात. कास्तकरी गेला की, घरची शेती कोण सांभाळेल. मात्र नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांचं काहीही न एेकता त्याला गावच्या चौकात रस्त्यावरच गोळी घातली. नक्षलवादी निघून गेल्यावर गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने जाऊन त्याचा मृतदेह आणला. शेळ्या-गाई-गुरं राखणारी. दुर्गम भागात राहणारी ही कुटुंब अन्यायाविरोधात लढत नाहीत. खून्यांना फाशी द्या, म्हणून रडतही नाहीत. आपल्या माणसाला कसं मारुन टाकलं हे सांगतात ते फक्त.
   
    पुढचं गावं होतं रेगडी. या गावात तर एका आईचे न थांबणारे अश्रू आपल्या डोळ्यातही पाणी आणतात. तिच्या मुलाला ती शरु म्हणायची. कोंबडी कशी पिलाला पोसते तसं मी त्याला पोसलं मोठं केलं. दुख नाय होनार तो मेल्याचं?”...ती हुंदके देत मला विचारत होती. शरुला आणि त्याच्या मित्राला पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी मारुन टाकलं. त्याआधी तीन दिवस त्याचं घरातूनच अपहरण केलं होतं. तीन दिवस मायलेक पोराला शोधत फिरत होते. आणि चौथ्या दिवशी ओळखीच्या माणसाकडून निरोप मिळाला...शरुला नक्षलवाद्यांनी मारुन टाकलंय...सोबत पर्ची पण टाकली होती. पोलिसांचा मुखबीर असल्यामुळे आम्ही याला मारतोय अशी. रक्ताचा सडा आणि दोन तरण्याबांड तरुण आदिवासींचे मृतदेह. बेहोश आईला स्वत:ला सावरताच येत नाहीये. ती म्हणते मला शरुचं नाव काढलं तरी रडायलाच येतं. जेवताना पोरगा दिसतो. झोपले की तोंड फिरवून मी रडत राहते. घरचे ओरडतात कशापाई एकढी रडते...पण काय करु...सारखं तोंड बोलत नाही...पोटं बोलतं...इथं त्याची आठवण येत राहते...शरुला नक्षलवाद्यांनी मारलं तेव्हा त्याची पत्नी सात महिन्यांची गरोदर होती. आज त्या दोघांची मूलगी सात महिन्यांची झालेय. बापाच्या मायेला ती पोरकी झालेय. पण तिच्यासारखी कितीतरी मुलं आज नक्षलावादाच्या छायेखाली वाढतायत.



·       गेल्या 20 वर्षात नक्षलवाद्यांनी 412 आदिवासींना ठार केलंय.
·       गोदिंया आणि गडचिरोली जिल्ह्यातली ही आकडेवारी. हे दोन्ही जिल्हे केंद्राच्या नक्षलग्रस्त यादीमधले जिल्हे.
·       गोंदियामध्ये 2009 च्या आधी आदिवासींना नक्षवाद्यांनी कधी ठार मारलं नव्हतं. पण आता, हा ट्रेंड बदलतोय.
·       एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 2011-12 मध्ये 408 आदिवासींना क्रूरपणे ठार करण्यात आलंय.

1 comments:

Unknown said...

Chhan lihites... aajkaal naxakwadacha buwa karun swatha pseudo-intellectuals bananyachya nadat asnari patrkar mandali baghitana asa kahi wachayla bhetala ki chhan watata.. please keep it up there is pressing need for urs kind..

 

Sample text

Sample Text

Sample Text