Social Icons

Pages

Saturday, June 28, 2014

मोदी आणि मोदींच्या विकास मॉडेलच्या दंतकथा!


नरेंद्र मोदींच्या लाटेवर त्यांचे चाहते इतके स्वार झालेत की आता त्यांचं वर्गीकरण ‘भक्त’ असं करता येईल. भक्तिमार्गावर पोहोचलेल्या मोदींच्या चाहत्यांमध्ये मोदी आणि त्यांच्या विकास मॉडेलमधील गुण-अवगुण पाहण्याएवढी वस्तुनिष्ठता उरलेली दिसत नाही. अत्यंत त्वेषाने, द्वेषानं आणि सूडाच्या भावनेने ’16 मेची वाट पाहा’, असे चित्कार सोशल मीडियावर ऐकू येतात. गुजरात विकास मॉडेल देशपातळीवर राबवलं जाणार असल्यामुळे आता गुजरातच्या भूमीमध्ये जाणं आणि हे विकास मॉडेल पाहणं फारच जिज्ञासेचं काम होतं.
सलग सहा महिन्यांत दुसर्‍यांदा ‘मोदींच्या गुजरात’मध्ये आमची टीम पोहोचली. ही भूमी मोदींची आहे, तशीच ती महात्मा गांधींची आहे… अहमदाबादमधल्या महात्मा गांधींच्या आश्रमातून 1930च्या दशकात राष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं हलली… विनोबा भावेंच्या वास्तव्यानं ही भूमी निर्गुण बनलीय!

जाती-धर्मातील तेढ आणि दंगलीचा इतिहासही गुजरातच्या या भूमीला आहे… मुद्दा हा आहे की कोणता वारसा पुढे सुरू ठेवायचा? आणि कोणता नाही? हे राजशकट चालवणार्‍या राज्यकर्त्याच्या हातात असतं. 2001-02 मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात (कारसेवक ?) मारले गेल्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं आणि त्यानंतर पेटलेल्या दंगलीला आवर घालण्यात ते ज्या पद्धतीनं अपयशी ठरले, ते पाहता मोदींनी दंगलींचा वारसा पुढे सुरू ठेवला. पण सत्य, अहिंसा, शांततेचा गांधींचा वसा पेलण्यात ते कमी पडले, हे उघड झालंय. सरदार पटेलांचा करारीपणा आपल्या अंगात बाणवल्याची थोरवी मोदी ऐकवत असतात, पण धार्मिक तेढीबद्दल माफी मागण्याइतकं मोठं मन त्यांना करता आलं नाही. नरोडा-पाटियासारख्या दंगलीनं सर्वाधिक होरपळून निघालेल्या वस्तीमध्ये जाण्यासाठी मोदींची 56 इंच रुंद छाती धजावत का नाहीये? नरेंद्र मोदी दंगलीबद्दल माफी कधी मागतील? असा प्रश्न सतत विचारला जातोय. मोदींचं व्यक्तिमत्त्व हे माफी मागणारं व्यक्तिमत्त्व नाही, असं त्यावर उत्तरादाखल सांगितलं जातं.
4narendra_modi_meeting4
पण 30 एप्रिलला अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर याच नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये जनतेची क्षमा मागितली. ‘पूर्वी मी मतदानाच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये अधिक वेळ देत होतो. या निवडणुकीत दोन दिवसातील फक्त 18 तास मी गुजरातमध्ये प्रचार केला,’ हातामध्ये कमळाचं चिन्ह घेऊन मतदानादिवशी मोदींनी सकाळी नऊ वाजताच जी क्षमा मागितली, त्याचा भावनिक प्रभाव मतदारांवर पडला नसेल का? कोणती क्षमा कधी मागायची याचा चाणाक्षपणा मोदींनी दाखवला, असं समर्थक म्हणतायत. पण हा राजकीय चाणाक्षपणा म्हणायचा की लबाडी?

आपला कुटुंबकबिला नाही… त्यामुळे मी भ्रष्टाचार-घराणेशाही करणार नाही, अशी दिंडी स्वत: मोदींनीच पिटली होती… पण कुटुंबकबिला नसला म्हणून काही मोदी हे अण्णा हजारेंप्रमाणे मंदिराच्या एका खोलीत वगैरे संन्यस्त जीवन जगत आहेत, असा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा आलिशान बंगला आहे. त्या बंगल्याबाहेर आणि राजभवन परिसराबाहेर जवळपास अडीच किलोमीटरपर्यंत कडेकोट सुरक्षा तैनात असते. तीच गोष्ट सचिवालयाची. महाराष्ट्रातल्या मंत्रालय परिसरात कधीही जावं, सर्वसामान्य नागरिकांचा वावर मंत्रालयात दिसतो. पण गुजरातच्या सचिवालयात ‘स्वर्णिम संकुल’मध्ये मात्र ‘बिग बॉस वॉचिंग’ परिस्थिती आहे. महाराष्ट्रात वर्षा बंगल्याबाहेर उभं राहून टेलिव्हिजन पत्रकार रेकॉर्डिंग करू शकतात, गुजरातमध्ये तशी परिस्थिती नाही.

मोदींच्या विकास मॉडेलबद्दल तर काय बोलावं? गांधीनगरमध्ये 27 एप्रिलला लुटारूंनी एका महिलेचं मंगळसूत्र चोरलं. त्यात ती महिला गंभीर जखमी झालीय. गुजरातमध्ये सर्वसामान्य महिला सोनसाखळी चोरांमुळे हैराण झाल्या आहेत. हेमाली मिस्त्री या 19 वर्षांच्या मुलीची हत्या फेब्रुवारी 2012 मध्ये करण्यात आलीय. एकतर्फी प्रेमातून तिच्या मानेवर आणि पाठीवर त्यानं चाकूनं हल्ला केला. हल्ला केल्यानंतर तिचा मारेकरी किशन शर्मा हा फरार झालाय. अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या गुजरातच्या सक्षम गृहमंत्रालयाला हेमालीच्या कुटुंबाला आजतागायत न्याय देता आला नाहीये. हेमालीच्या कुटुंबावरची भीतीची छाया ‘पूर्णपुरुषोत्तम’ नरेंद्र मोदी दूर करू शकले नाहीत… या कुटुंबाला अखेर बडोदा सोडून जावं लागलंय. स्नूपगेटबद्दल तर आता विरोधकांसह सगळ्यांची बोलतीच बंद झालीय म्हणा की!
narendra modi rajnath_news
मोदींच्या इतिहासाला आता (अगदी गरिबीची पितांबरी वगैरे लावून) चकचकीत झळाळी देण्यात आलीय. त्यांची आई धुणी-भांडी करायची आणि मोदी चहा विकायचे वगैरे…! पण वस्तुस्थितीपेक्षा हे सारं वर्णन अत्यंत रंजक करण्यात आलंय. पण याच काळात मोदींनी त्यांच्या ऐन विशीतील 2 वर्षं नेमकी कुठं घालवली, याची खरी माहिती कुणालाच नाहीये. मोदी विवेकानंदांच्या आश्रमात होते, मोदी हिमालयात होते, मोदी तेव्हा भारतभ्रमण करत होते, अशा एक ना अनेक आख्यायिका रंगवून सांगितल्या जातात. एकूणच मोदींच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जसं संशयाचं वलय आहे तसंच संशयाचं वलय त्यांच्या विकास मॉडेलभोवतीही आहे.
मोदींच्या गांधीनगरच्या बंगल्यामागे 500 मीटर अंतरावर बोरीज नावाचं गाव आहे. गांधीनगर नगरपालिकेच्याच क्षेत्रातच हे गाव येतं. या गावातील मताधिक्य हे काँग्रेसला जातं. कोणतं गाव कोणत्या पक्षाचं आहे, हे आता गुप्त राहिलेलं नाही. मोदींच्या गांधीनगरमध्येही अशी गावं आहेत, जी पारंपरिक काँग्रेसची आहेत. तर या बोरीज गावामध्ये रस्ता नाही आहे. पिण्याच्या पाण्याची वाताहत आहे. गटारातलं पाणी गाळून पिण्यापर्यंतची नामुष्की लोकांवर येते. नळाला येणारं अत्यंत बारीक धारेचं पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. विजेचा पत्ता नाही. इथल्या महिला आणि पुरुष मोदींच्या नावानं बोटं मोडत होते. आम आदमी पक्ष वगळता कोणताच पक्ष या गावाची दुरवस्था बघायला तयार नाहीये. अगदी मोदीही!

बडोदा शहरातील राजघराण्याचे वंशज आणि काँग्रेसचे माजी खासदार सत्यजीत गायकवाड यांनी या विकास मॉडेलवर काही प्रश्न उपस्थित केलेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सत्यजीत गायकवाडांपर्यंत अनेकांनी मोदींना विकासाच्या या मॉडेलवर चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. गुजरात राज्यावर आता 1,85,310 कोटींचं कर्ज का आहे? 4,00,000 शेतकर्‍यांना अजूनही वीज कनेक्शन का पोहोचलेलं नाही? गेल्या दहा वर्षांत 5000 शेतकर्‍यांनी गुजरातमध्ये आत्महत्या का केल्यात? साठ हजार लघु आणि मध्यम उद्योग गुजरातमध्ये बंद का पडलेत? गुजरातच्या ग्रामीण भागात 30 टक्के गावांपर्यंत अजूनही रस्त्यांचं जाळं का पोहोचलेलं नाही? 3,819 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय का नाहीये? कॅगच्या अहवालानुसार, गुजरातमध्ये 6,13,000 मुलं कुपोषित का आहेत? नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार, भ्रष्टाचारामध्ये गुजरात देशातलं सहावं राज्य का आहे? महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये गुजरातमध्ये 39 टक्क्यांनी वाढ का झालीय? गुजरातमधले 10,00,000 तरुण आजही बेरोजगार का आहेत? आशियातील मुस्लिमांची सर्वात मोठी झोपडपट्टी गुजरात राज्यात का आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार, गुजरातमध्ये 2923 झोपडपट्ट्या का आहेत? गुजरातमध्ये शाळागळतीचा मुलांचा दर 57.9% इतका का आहे? (भारतातील मुलांचा शाळागळतीचा दर हा 49.3% आहे.) गुजरात सरकार केवळ खासगी शाळांनाच प्रोत्साहन का देतंय आणि सरकारी शाळांना का नाही? गुजरातमधील शिक्षक – विद्यार्थी प्रमाण हे 1:52 का आहे? (राष्ट्रीय प्रमाण 1:32 आहे.) गुजरातच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची 33 टक्के कमतरता आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर्स, नर्सेस यांचीही गुजरातमध्ये कमतरता का आहे? फाळणीच्या काळात गुजरातमध्ये येऊन स्थायिक झालेल्या शीख शेतकर्‍यांच्या समस्या का सोडवल्या जात नाहीत? त्यांचे जमिनीचे हक्क का हिरावून घेण्यात आलेत?’


मोदींचे समर्थक म्हणतील, हे प्रश्न महाराष्ट्रातही आहेत आणि इतर राज्यांतसुद्धा. म्हणजेच गुजरातचं विकास मॉडेलदेखील हे प्रश्न सोडवू शकलेलं नाहीये. त्याबद्दल प्रश्न उठवायला आणि विचारायला वावच दिला जात नाही. राष्ट्रीय मीडियाच्या माध्यमातून गुजरातचा रंगरंगोटी केलेला चेहराच दाखवला जातो. गुजरातमध्ये विकास झालाय. अहमदाबादमध्ये रस्ते रुंद असल्यानं BRTS राबवण्यात आली. केंद्राच्याच निधीवर त्याची अंमलबजावणी झालीय. साबरमती रिव्हर फ्रंट योजनाही केंद्राच्या निधीवर तिथं राबवण्यात आलीय. चकचकीत गुजरात हा असा केंद्राच्या-यूपीएच्या सहकार्यातूनच घडलाय ! निव्वळ मोदींच्या करिष्म्यातून नव्हे ! खुली चर्चा केली, सत्य सांगितलं तर हे मॉडेल समोर येईल आणि मग दंतकथा खपणार नाहीत, अशा भीतीतून खुल्या चर्चेचं आव्हान स्वीकारलं जात नाही का?

- अलका धुपकर, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत 

0 comments:

 

Sample text

Sample Text

Sample Text